23/10/2019
🙏🙏🙏 #कुठे_गेले_ते_दिवस🙏🙏🙏
आवडली पोस्ट तर नक्की बालपणीच्या मित्रांना पाठवा
एव्हाना सहामाही परीक्षा संपून सुट्टी सुरु झालेली असायची. दसऱ्यापासूनच थंडी पडायची आणि दिवाळी येईपर्यंत ती वाढत जायची. दिवसभर खेळून हाथ-पाय थंडीने उकलायचे. किल्ला गोरूच्या मातीने भगवा करून टाकायचा. त्यावरचे हळीव चांगलेच वाढायचे. सलाईनच्या कारंज्यात दिवसभर पाणी भरत बसायचे. वाऱ्याने मावळे पडायचे. चिखल सुकून बुरुजाला भेगा पडायच्या. दिवस जायचा 'गड' राखण्यात !! फटाक्यांची भलीमोठी यादी कधीच तयार असायची. मग मातीचा गल्ला फोडला जायचा. त्यात सापडायची इकडून तिकडून उचललेली ५, १०, २०, २५ पैसे... आठ-आणे, रुपयाची नाणी. फटाके आणायला खारीचा वाटा. फटाक्याच्या दुकानात अधाश्यासारख व्हायचं. लवंगी, लक्ष्मी, सुतळी, कनकावळे, भुईनुळे, चक्र, फुलझडी, नागगोळी, टिकल्या आणि पिस्तुल. पिशवी गच्च भरायची. एकदम 'श्रीमंत' झाल्यासारखं वाटायचं.
घरी येवून भाऊ-बहिणींबरोबर त्याची वाटणी व्हायची. अगदी वात गळालेल्या फटाक्यांची सुद्धा !! हाताला छान चांदीसारखा दारूचा रंग लागायचा. भारी वाटायचं. हीच काय ती दारू माहिती तेव्हाची !!
'पोरानो, लवकर झोपा. सकाळी अभ्यंगस्नानाला उठायचं आहे' - आई, बाबा, आजी सांगायची. पण इथे झोप कोणाला असायची....! कुडकुडणारी थंडी, बाहेर मंद प्रकाश, दूरवरून कोंबड्याची बांग ऐकू यायची. आईला उठवायचं. न्हाणीघरात पितळी बंब पेटायचा. त्याच्या जवळ बसून अंगात उब आणायची. आई उटणे लावायची. गार लागायचं. तो गरम पाण्याचा तांब्या अंगावर घेतला कि छान वाटायचं. त्या पाण्याला धुराचा वास असायचा. मला तो आवडायचा. 'मोती' साबण छोट्याश्या हातात मावायचा नाही आणि बादलीतल पाणी संपूच नाही असं वाटायचं.
देवघरात आई आम्हाला ओवाळायची. नवे कोरे कपडे अंगात घालायची. डोक्याला वासाचं तेल लावायची. ते गोठायचं नाही म्हणून बरं वाटायचं.
*मोठ्यांच्या पाया पडून फटाके वाजवायला पळायचो फक्त एक लवंगी सर वाजवायचा बाकी सगळे सोडून, पुरवून पुरवून. त्यातच मज्जा असते.*
दिवस हळूहळू उजाडायचा. न वाजलेले फटाके सापडायचे. केवढा जास्त आनंद व्हायचा त्याचा. आता हे सगळे लिहिताना विचार येतोय, कधी जगलो असं शेवटचं? लहान होवून, छोट्या गोष्टीत रमून, निरागसपणे.
सर्वात जास्त आवडणारी दिवाळी मागे पडलीये कि आपण खूप पुढे आलोय ?
😄😄😄😄😊😊😊😊
आज आठवते ना आपल्या लहानपणीची दिवाळी. २५ पर्यंत पाढे पाठांतर, २१ दिवसांचे दहा ओळींचे शुद्धलेखन, कविता पाठांतर, निबंध. दिवाळी सुट्टी अभ्यासासाठी दोनशे पानी वही व शुद्धलेखनासाठी शंभर पानी दुरेघी वही.
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी. इतका दिवाळीतला गृहपाठ करूनसुद्धा आपण दिवाळीत धम्माल करायचो. किल्ले बनवायचो, रांगोळीसाठी अगरबत्तीने ठिपके पाड़ून द्यायचो. मनसोक्त फटाके फोडायचो. सापाची गोळी आठवते ना... टेलिफोनचा फटाका आठवतो का... चिड़ी कुठून कुठे उड़ायची माहित आहे ना... राॅकेट साठी कुठून पण बाटली शोधून आणायचो. रस्त्यावर लावलेला बाण आड़वा होऊन कोणाकोणाच्या ढेंगातून गेला होता आठवतंय ना. कधी कधी बाण कोणाच्या खिडकीतून घरात घुसायचा, मग त्या काकी भडकण्याच्या आधी सगळे तिथून धूम ठोकायचे.
सगळे फटाके संपल्यावर अर्धवट पड़लेल्या फटाक्यांची दारू पेपरमध्ये जमा करायचो आणि पेपराला सगळ्याबाजूने आग लावल्यानंतर उड़ालेला आगीचा ज्वाळ पहाताना मिळणारा आनंद.
खरंच, दिवाळीच्या दिवसात आम्ही श्रीमंत व्हायचो कारण बाबा, मामा, काका, खिशात पैसे टाकायचे आणि उरलेल्या दिवसात अर्ध्या तासाचे 50 पैसे किंवा तासाचा 1 रुपया देऊन सायकल भाड़्याने घेऊन फिरायला जायचो ना...
आता फक्त हातात मोबाईल घेऊन त्यातच गर्क असलेली मुले दिसतात तेव्हा सांगावेसे वाटते, अरे दिवाळी म्हणजे व्हाॅटसअपवरचे मेसेज आणि व्हिड़ीओ नसतात रे....!
असो.... !! 💥⭐💥