16/04/2026
Proud moment for Shri Amolak Jain Vidya Prasarak Mandal, Kada.
सरपंच परिषद महाराष्ट्र यांच्याकडून अमोलक संस्थेला शताब्दी दीपस्तंभ पुरस्कार जाहीर-
कडा (प्रतिनिधी): सरपंच परिषद, मुंबई महाराष्ट्र च्या वतीने दिला जाणारा मानाचा 'राज्यस्तरीय शताब्दी दीपस्तंभ पुरस्कार' यंदा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा येथील श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ या संस्थेला जाहीर झाला आहे. या परिषदेच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा गौरव म्हणून हा पुरस्कार दिला जातो .
सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी या संदर्भात दिलेल्या पत्रात संस्थेच्या शैक्षणिक योगदानाची दखल घेत हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.
कडा येथील श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ ही १०० वर्ष जुनी शिक्षण संस्था असून सर्व जाती-धर्माच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अथक परिश्रम घेत आहे. एकसंध, कर्तव्यनिष्ठ, स्वावलंबी व भयमुक्त आदर्श समाजाची निर्मिती हेच येथील शिक्षणाचे ध्येय मानले जाते. या संस्थेतून नैतिकता, प्रामाणिकपणा व श्रमसंस्काराचे धडे घेऊन बाहेर पडलेले असंख्य माजी विद्यार्थी देश-विदेशात डॉक्टर, इंजिनिअर्स, सैन्य दलामध्ये, पोलीस दलामध्ये, कलेक्टर, व्यापारी, शेतकरी, अधिकारी व समाजसेवक म्हणून आदर्श आणि यशस्वी जीवन जगत आहेत. अर्थात निःस्वार्थी, स्वाभिमानी व चारित्र्यसंपन्न देशभक्त नागरिक तयार व्हावेत ही या संस्थेची कायमची ध्येयधोरणे आहेत. कौटुंबिक जबाबदारी बरोबरच सामाजिक व राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे सामर्थ्य विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावे असा या संस्थेचा सदैव प्रयत्न राहिलेला आहे.
संस्थेच्या कार्यकारी व विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी व सदस्य, विविध विभागांचे प्राचार्य, प्राध्यापक शिक्षक, राज्यस्तरीय, विद्यापीठ स्तरावरील विविध महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित झालेले आहेत. एम. पी. एस. सी. व यू. पी. एस. सी. आणि स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनामुळे दरवर्षी या संस्थेचेअनेक विद्यार्थी शासकीय नोकरीवर रुजू होत असतात.
संस्थेच्या ३३ एकर कॅम्पसमधील दोन एकर जागेत अमोलक तीर्थंकर गार्डनची निर्मिती करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये १००८ प्रकारचे आयुर्वेदिक देशी झाडांचे लागवड समाज हितासाठी करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व देशप्रेमाची आवड निर्माण व्हावी म्हणून संस्थेने एन. सी. सी. हा कोर्स स्वतःच्या खर्चाने चालवलेला आहे. सध्या संस्थेमध्ये बालवाडी प्राथमिक विभाग ,इंग्लिश मीडियम विभाग ,माध्यमिक विभाग आर्ट कॉमर्स सायन्स ज्युनिअर कॉलेज आणि सीनियर कॉलेज, पदव्युत्तर अभ्यासक्रम ,यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत विविध अठरा कोर्सेस, बीसीए ,इंजीनियरिंग कॉलेज डी फार्मसी कॉलेज, बी फार्मसी कॉलेज ,यशस्वीरित्या चालू आहे. आगामी काळामध्ये संस्थेच्या कॅम्पसमध्ये मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज, हॉस्पिटल, वृद्ध साधुसंतांसाठी राहण्याची व्यवस्था, स्टाफ क्वार्टर्स, मुलींचे वसतिगृह ,विविध क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे.
त्यामुळे कडा व परिसरातील नागरिकांना वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळणार आहे. संस्थेच्या विकासात सर्व समाज बांधव, मान्यवर देणगीदार, माजी विद्यार्थी, निःस्वार्थ व समर्पित भावनेने कार्यरत विश्वस्त व कार्यकारी मंडळ, पालक, विद्यार्थी, उच्च विद्वान शिक्षक व शिक्षकेतर वर्ग यांचा मोलाचा सहभाग राहिलेला आहे. संस्था त्यांची सदैव ऋणी राहील. साधु-संतांच्या आशीर्वादाने व आपल्या सर्वांच्या सहकार्याने स्वतंत्र जैन विद्यापीठाची स्थापना करण्याचा मानस लवकरच साकार होईल यात शंका नाही. संस्थेच्या याच निस्वार्थ आणि दर्जेदार शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यासाठी सरपंच परिषदेच्या राज्य कार्यकारिणीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. हा गौरव सोहळा गुरुवार, दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता यशदा, पुणे येथे होणार आहे. प्रा. राम शिंदे (सभापती, विधान परिषद महाराष्ट्र राज्य ) आणि जयकुमार गोरे (ग्रामविकास मंत्री) यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. आमदार श्रीकांत भारतीय आणि महाराष्ट्र राज्य आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार हे सदरील पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आहेत. सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री दत्ता काकडे यांनी या पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे या पुरस्कारामुळे अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.