19/02/2017
या १० गोष्टीमुळे छत्रपती शिवाजी महाराज ठरतात सर्व राजांपेक्षा वेगळे
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणा-या शिवाजी महाराजांबद्दल सा-या जगाला कुतूहल आहे. त्यांच्यावरून राजकारणही पेटतं. शिवाजी आमचे की तुमचे असा वादही निर्माण होतो. पण खरंच शिवाजी महाराज कोण होते हे जाणून घेणे आज अधिक महत्वाचे झाले आहे. देशात अनेक राजे होऊन गेले पण शिवाजी महाराज त्या राजांपेक्षा वेगळे कसे होते हे माहिती करून घेणं महत्वाचं आहे.
१) स्वत:च स्वत:चं राज्य निर्माण केलं:
शिवाजी महाराज हे जन्माने राजपूत्र नव्हते. जन्मताच त्यांच्या तोंडात चांदीच चमचाही नव्हता. त्यांनी स्वत: त्यांचं मराठी माणसाचं विश्व निर्माण केलं. त्यांनी मुघल, निजाम, आदिशाही, ब्रिटीशांशी झुंज देऊन स्वत:चं राज्य तयार केलं. त्यांना ह्या गोष्टी पिढीजात मिळालेल्या नाहीयेत. महाराजांनी पहिला किल्ला त्यांच्या वयाच्या १६ वर्षी जिंकला होता. यावरून त्यांचं वेगळेपण दिसून येतं.
२) महाल उभारण्यापेक्षा १०० पेक्षा जास्त किल्ले बांधले:
इतर राज्यांप्रमाणे शिवाजी महाराजांना ऎश आरामात राहणे कधीही पसंत नव्हते. किंवा त्यांनी ते पसंत केले नाही. त्यांनी स्वत:साठी एकही महाल उभारला नाही. त्यांऎवजी त्यांनी त्यांच्या जनतेचं रक्षण करता यावं म्हणून १०० पेक्षा जास्त किल्ले उभारले.
३) टॅक्स सिस्टीम बदलली:
शिवाजी महाराजांच्या आधी स्थानिक कर्जवसूलदार हे लोकांकडून कोणत्याही नियमाविना टॅक्स गोळा करायचे. कसेही आणि कितीही प्रमाणात लोकांकडून टॅक्स गोळा केला जायचा. पण शिवाजी महाराजांनी ही पद्धत बदलून शेतक-यांकडून वसूल करण्यात येणारा टॅक्स कमी करून टाकला.
४) शेतक-यांना मदत:
अनेक लोकांकडे शेती करण्यासाठी स्वत:ची जमीन नव्हती. शिवाजी महाराजांनी सरकारी जमीन या लोकांना देऊन त्यांना शेती करण्यास मदत केली. सोबतच पुणे परिसरात अनेक धरणंही बांधली ज्याचा फायदा शेतीला मोठा झाला.
५) भारतीय नौदलाचे जनक:
शिवाजी महाराज हे फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणूनही लोकप्रिय आहेत. इंग्रजांच्या आक्रमणापासून वाचण्यासाठी शिवाजी महाराजांनी तेव्हा अतिशय दमदार असं आरमार त्यांनी तयार केलं होतं. त्यामाध्यमातूनच त्यांनी अनेकदा ब्रिटीश आणि फ्रेन्च लोकांना धूळ चारली आहे.
६) अनेक कायदे केले:
महाराजांनी त्यांच्या राज्यात अनेक मजबूत कायदे तयार केले. जे सर्वसामान्य माणसाच्या फायद्याचे होते. रयतेला, जनतेला वेठीस धरण्याची त्यांची वृत्ती अजिबात नव्हती. उलट त्यांच्या फायद्याचे अनेक कायदे त्यांनी त्यावेळीच तयार केले होते आणि त्याचे पालनही केले जात होते. स्त्रियांच्या संरक्षणासंबंधी अनेक कायदे तेव्हा त्यांनी केले होते.
७) धर्मनिरपेक्षवादी:
शिवाजी महाराज हे भारतातील सर्वात धर्मनिरपेक्षतावादी राजा म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सैनिक होते. त्यांचे कित्येक अंगरक्षक हे मुस्लिम होते. मुस्लिमांसोबतच इतरही अनेक जातींची लोकं त्यांच्या सैन्यात होती.
८) महिलांचा आदर:
शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्याला असा आदेश दिला होता की, लहान मुलांना आणि महिलांना जराही नुकसान पोहचवू नका. शिवाय दुश्मनांच्या एकाही महिलेला इजा केलेली किंवा त्रास दिलेला शिवाजी महाराजांना चालत नव्हतं. सैनिकातील कुणी असे केल्यास ते सैनिकाला कठोर शिक्षा करीत होते. महिलांचा आदर करणे हा त्यांचा आदेश होता.
९) ते अंधश्रद्धाळू नव्हते:
शिवाजी महाराज हे श्रद्धाळू होते पण अंधश्रद्धाळू नव्हते. अमावस्येची रात्र ही अपशकून मानली जाते पण त्यांनी कित्येक लढाया अमावसेच्या रात्रीच केल्या आहेत.
१०) गनिमी कावा:
गनीमी कावा अथवा इंग्रजीत गुर्हिल्ला वॉर हे एक प्रकारचे युद्धतंत्र आहे. ज्यात अतिशय कमी संख्यबळाने तुलनेने मोठ्या सैन्यास जेरीस आणता येते. यात मुख्य डावपेच बेसावध शत्रूवर अचानक हल्ला करून त्याची जास्तीत जास्त हानी करून, शत्रू सावध होण्यापूर्वी माघार घेतली जाते. असे अनेक छुपे अचानक हल्ले केल्याने शत्रूच्या मनोधैर्य खच्ची होते. गनिमी काव्याचा वापर करून छोटे सैन्य मोठ्या सैन्याचा पराभव करू शकते. महाराष्ट्रातील सह्याद्रीजवळील प्रदेश ह्या युद्धनीतीच्या वापरास अत्यंत सोयीचा आहे. शिवाजीराजांच्या युद्धनीतीत गनिमी काव्याचे महत्त्व खूप आहे.