13/05/2026
नीट-यूजी 2026 परीक्षा प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी : अभाविप
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नीट-यूजी 2026 परीक्षेशी संबंधित समोर आलेल्या कथित पेपर लीक, अनियमितता तसेच परीक्षा प्रक्रियेच्या गोपनीयता व विश्वासार्हतेबाबत उपस्थित झालेल्या गंभीर प्रश्नांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. विविध माध्यमांमधून, राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) तसेच तपास यंत्रणांकडून समोर येत असलेल्या माहितींमुळे देशभरातील लाखो विद्यार्थी व पालकांच्या मनात परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकता व विश्वासार्हतेबाबत गंभीर शंका निर्माण झाली आहे.
अभाविपचे स्पष्ट मत आहे की, प्रवेश परीक्षांच्या पवित्रता, सुचिता व विश्वासार्हतेशी कोणत्याही प्रकारची तडजोड स्वीकारार्ह नाही. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका किंवा त्यासंबंधित माहिती
काही व्यक्तींपर्यंत पोहोचली असेल, तर तो केवळ परीक्षा व्यवस्थेवरील आघात नसून वर्षभर परिश्रम करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी केलेला अन्याय आहे.
अभाविपने सुरुवातीपासूनच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली होती. केंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपविण्याचा घेतलेला निर्णय हा योग्य व आवश्यक पाऊल असल्याचे अभाविपने म्हटले आहे. सीबीआय चौकशीत समोर येणारे पुरावे, नेटवर्क व संबंधित दोषी व्यक्तींची माहिती सार्वजनिक करण्यात यावी, जेणेकरून राष्ट्रीय परीक्षांमध्ये सक्रिय असलेल्या शिक्षण-माफिया व भ्रष्ट साखळीचा संपूर्ण भांडाफोड होऊ शकेल.
अभाविपची मागणी आहे की, या प्रकरणात सहभागी असलेल्या परीक्षा-माफिया, संबंधित अधिकारी तसेच कोणत्याही स्तरावर सहकार्य करणाऱ्या सर्व दोषींवर कठोरतम कारवाई करण्यात यावी. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस संरक्षण मिळता कामा नये.
राष्ट्रीय स्तरावरील विविध परीक्षांमध्ये सातत्याने समोर येणाऱ्या गोंधळांमुळे राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) च्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वर्षभर कठोर परिश्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत वारंवार अशा घटना घडणे हे अत्यंत दुर्दैवी व विश्वासघातकी आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारत NTA च्या महासंचालकांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, तसेच NTA च्या रचना व भूमिकेची व्यापक पातळीवर पुनर्रचना व पुनरावलोकन करण्यात यावे.