26/02/2018
जातीय दमनाच्या विरोधात वर्गीय एकजूट उभारा
कॉम्रेड शैलेंद्र कांबळे
तेलगाव दि २५ (प्रतिनिधी) : देशभरात सामाजिक आणि जातीय दंगली होत असतांना आपल्या देशातील सरकार गोहत्या किंवा गोमांस कोणी खावू नये असे कायदे करण्यात धन्यता मानत आहे. परिवर्तनवादी विचार करणार्या लेखक, साहित्य, पत्रकार, बुद्धिजीवींना लक्ष करून त्यांना ठार मारले जात आहे. या अशा जातीय दमनाच्या विरोधात आपली वर्गीय एकजूट भक्कम उभारा असे प्रतिपादन कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांनी केले.
जाती अंत संघर्ष समितीच्या वतीने मानवी हक्क अभियान कार्यालय, तेलगाव ता. धारूर येथे आयोजित केलेल्या पहिल्या जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी कॉ. दत्ता डाके यांची उपस्थिती होती. या मेळाव्याला बब्रुवाहन पोटभरे, प्रा.बाबासाहेब सरवदे, उत्तम माने, पी. एस. घाडगे यांचीही उपस्थिती होती.
पुढे बोलताना शैलेंद्र कांबळे महाराष्ट्रात आणि देशात धर्मांध विचारांचे सरकार सत्तारूढ झाल्यापासून येथील विद्यार्थी, महिला, शेतकरी, शेतमजूर, सुरक्षित नाहीत. भीमा कोरेगावला घडलेल्या घटनेचे सूत्रधार मोकाट फिरत आहेत आणि निरपराध दलित वर्गातील तरूणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या देशातील जबाबदार मंत्री खुलेआम संविधान बदलण्याची भाषा बोलतात त्यांच्यावर कुठलीही कारवाही होत नाही. म्हणून संविधानाच्या रक्षणासाठी आणि आपल्या मूलभूत मानवी अधिकाराचा लढा निकराने पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आज अनेक पटीने वाढली आहे.
यावेळी मेळाव्याला मानवी हक्क अभियानाचे राजेंद्र घोडे, भारीप बहुजन महासंघाचे नेते धम्मानंद साळवे, शेकापचे नेते भाई मोहन गुंड, राम शेळके, पी. एस. घाडगे यांनी शुभेच्छा दिल्या. तर विविध तालुक्यातील प्रतिनिधींनी आपले अनुभव कथन केले. मेळाव्याचे प्रास्ताविक प्रा. बाबासाहेब सरवदे यांनी केले तर भुमिका बब्रुवाहन पोटभरे यांनी विषेध केली. मेळाव्याला माजलगाव, परळी, अंबाजोगाई, बीड या तालुक्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. यानंतर आकरा सदस्यांची नवीन जिल्हा समिती निवडण्यात आली. जिल्हा निमंत्रक म्हणून बब्रुवाहन पोटभरे यांची एकमताने निवड करण्यात आली. तर दत्ता डाके, प्रा.बाबासाहेब सरवदे, उत्तम माने, अॅड. अजय बुरांडे, गंगाधर पोटभरे,शांतीलाल पटेकर,गणेश खेमाडे,आणि निवृत्ती साळवे यांची निवड झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विशाल गोरे यांनी मानले.
कॉ. विशाल गोरे