03/02/2025
पहिले क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिक राजे उमाजी नाईक यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली. त्यांच्या पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन!
राजे उमाजी नाईक या महान क्रांतिकारकांचा आदर आणि त्यांचे स्मरण सर्वच जातिधर्मातील लोकांनी केले पाहिजे.
राजे उमाजी नाईक यांचा जन्म ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी झाला. उमाजी नाईक यांचे वडील दादाजी खोमणे हे लढाऊ आणि झुंजार होते. पुरंदर किल्ल्याचे रखवालदार म्हणून त्यांनी काम केले. आपल्या वडिलांकडून उमाजी नाईक यांनी गोफण चालविणे, तीरकमठा मारणे, कुऱ्हाड चालवणे, दांडपट्टा, भाला फेकणे आदी युद्धावेळी कामाला येणारी कौशल्ये शिकून घेतली. वयाच्या ११ व्या वर्षी उमाची नाईक यांच्याकडे वंशपरंपरेने वतनदारी आली. उमाजी नाईक खंडोबाचे भक्त होते. आपल्या पत्रावर ते ‘खंडोबा प्रसन्न’ असं लिहायचे.
अन् इंग्रजी सत्तेविरोधात बंड पुकारले - रामोशी समाजाकडे पुरंदर किल्ल्याचे रक्षण करण्याचे काम होते. मात्र १८०३ मध्ये इंग्रजांनी रामोशी समाजाकडून हे काम काढून घेतले. इंग्रजांच्या या निर्णयामुळे पुरंदरमधील रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली होती. महिला, मुलांना अन्न मिळेनासे झाले होते. त्यामुळे उमाजी नाईक यांनी शिवरायांना स्फूर्तीस्थान मानत लोकांना गोळा करणे सुरु केले. त्यांनी कृष्ण नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोळंसकर तसेच विठुजी नाईक अशा तरुणांना गोळा केले. तसेच या साथीदारांच्या मदतीने उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरोधात बंड पुकारले होते. यानंतर उमाजी नाईक आणि इंग्रज यांच्यात संघर्ष सुरु झाला.
पुढे उमाजी नाईक इंग्रज, वतनदार तसेच सावकारांना लुटायचे. लुटलेले धन तसेच अन्न गरीब लोकांमध्ये वाटायचे. महिला, मुलांना मदत करायचे. कोणावर अत्याचार झालाच मदतीसाठी धावून जायचे. पुढे उमाजी नाईक यांच्या कारवाया वाढल्या आणि इंग्रजांना उमाजी नाईक यांचा त्रास होऊ लागला. १८१८ मध्ये उमाजी यांना एका वर्षाचा तुरुंगवास झाला. त्यानंतर आणखी एका दरोड्यात त्यांना पकडण्यात आले. यावेळी त्यांना सात वर्षाची शिक्षा झाली होती. या काळात त्यांनी लिहणे आणि वाचणे शिकून घेतले होते.
पुढे उमाजी नाईक यांचा इंग्रजांविरोधातील संघर्ष वाढत गेला. उमाजी नाईक यांनी इंग्रजांना सळो की पळो करुन टाकले. त्यानंतर इंग्रजांनी उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी वेगवेगळे इनाम जाहीर केले. दोन ते तीन वेळा इंग्रजांनी उमाजी यांना पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केलेले होते. तसेच उमाजी यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी ॲलेक्झांडर मॅकिंटॉश या अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती. पुढे पुण्याचा कलेक्टर जॉर्ज गिबर्न याने २६ जानेवारी १८३१ रोजी जाहीरनामा प्रसिद्ध करुन उमाजी नाईक यांच्याविरोधात जो तक्रार देईल त्याला आकर्षक असे बक्षीस देण्याचे जाहीर केले. मात्र या प्रलोभनाला कोणीही बळी पडले नाही. उमाजी यांच्याविरोधात कोणीही तक्रार दिली नाही.
त्यानंतर इंग्रजांच्या या जाहीरमानाम्याला उत्तर म्हणून उमाजी नाईक यांनी १६ फेब्रुवारी १८३१ रोजी स्वत:चा जाहीरनामा जारी केला. उमाजी नाईक तसेच त्यांच्या साथीदारांनी कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, मराठावाडा या भागात आपली ताकद दाखवून दिली होती. इंग्रजांनी ८ ऑगस्ट १८३१ रोजी उमाजी यांना पकडून देणाऱ्यास १० हजार रुपयांचे बक्षीस तसेच ४०० बिघे जमीन देण्यासे जाहीर केले.
१५ डिसेंबर १८३१ ला भोर तालुक्यातील उतरोली या गावात रात्री बेसावध असताना इंग्रजांनी उमाजी नाईक यांना पकडले. त्यांना अटक करुन पुण्यातील मामलेदार कचेरी येथील काळ कोठडीमध्ये त्यांना ३५ दिवस ठेवण्यात आले. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालविण्यात आला. त्यानंतर ३ फेब्रुवारी १८३४ रोजी उमाजी नाईक यांना फाशी देण्यात आली. इंग्रजी सत्तेविरोधात बंड करणारे ते आद्य क्रांतीकरक होते.
डॉ. सुनील भंडगे