13/04/2026
ज्याप्रमाणे एखादी सुंदर वेल असते अन् त्यावर उमललेली सुंदर फुले असतात; सारीच तशी सारखी, पण तरीही खूप वेगळी. तीच वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी जो संघर्ष करावा लागतो, तोच त्यांना अधिक सुंदर बनवतो. अशीच एक सुंदर फुलांची सुरेल वेल स्वरांच्या, कलांच्या आधारे फुलत गेली अन् त्यावर सुंदर फुले उमलली. कानांवर सुंदर स्वर पडत कलेचे बाळकडू घेऊनच ही फुले वाढत गेली. त्यातलेच एक फुल म्हणजे आशाताई.
दिनानाथ मंगेशकर या सुरेल वेलीवर वाढलेले एक फुल. लहानपणापासून सुरांशी मैत्री करत, गीतांच्या बोलांवर स्वार होत, त्यांनी त्यांचे जीवनगीत सजवले.
स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण करण्यासाठी सुरुवातीला घ्याव्या लागणाऱ्या कष्टांनी त्यांना जिद्दी बनवले. वडिलांचा आधार अकाली जीवनातून हरवल्यामुळे त्यावरील साऱ्याच फुलांना लवकर मोठे व्हावे लागले.
आशाताईंनी देखील खूप लवकर कामास सुरुवात केली, परंतु सुरवातीची काही वर्षे संघर्षाची ठरली. तरीही हार न मानता, गाण्यावरच्या निस्सिम भक्तीने त्यांनी प्रयत्न कधीही सोडले नाहीत. अन् असा दिवस आला की आज असा कोणताही गीत प्रकार नाही जो आशाताई गायल्या नाहीत. संगीत विश्वात असे कोणीही नसेल ज्यांनी आशाताईंचे नाव ऐकले नसेल.
विविध भाषांतून आपला गोड आवाज त्यांनी श्रोत्यांना भेट देत त्यांना सुखी केले. सात दशकांच्या त्यांच्या संगीत प्रवासात त्यांनी बारा हजाराहून अधिक गाणी गायली अन् आपल्या भावपूर्ण गायनाने ऐकणाऱ्याच्या मनात घर केले. त्यांना अगणित पुरस्कारांनी सन्मानित केले गेले, परंतु प्रत्यक्षात आशाताई याच आपल्या साऱ्यांच्या आयुष्यातील सुरेल पुरस्कार आहेत. त्यांनी आपल्या संगीत क्षेत्राला एक वेगळी उंची मिळवून दिली. आपल्या साऱ्या भावनांची सोबत करणारी त्यांची गाणी आहेत. त्यांनी केलेली ही संगीत सेवा कायम सर्व श्रोत्यांच्या अन् या मातीच्या स्मरणात राहील.
अशा या आयुष्यभर सुरांच्या वेलीवर फुललेल्या जीवनगीतास आमचे अभिवादन!
Caption By Vaadasabha Member- Pranjal Katkar
Poster By Vaadasabha Member- Krutika Mali