16/04/2020
*अन् मी मास्तर झालो**
-------------------------------------------
अचानक मळमळ होऊ लागल्याने मला जाग आली. आजपर्यंत बऱ्याच वेळा मी लांबचा बसप्रवास केला होता परंतु ,मला मळमळ किंवा उलटी असं कधी झालं नव्हतं.मी खिडकीतून बाहेर पाहिलं तर मला खूप खोल दरी दिसली.दूरवर नजर जाईल तिथपर्यंत उंचच उंच डोंगर आणि त्या डोंगरावर ढग दाट वस्ती करत आहेत,त्याच्या अंगाखांद्यावर थुईथुई नाचत आहेत,त्याच्याशी लपाछपीचा खेळ खेळत आहेत,असं दृश्य मला लांबपर्यंत दिसत होते.हे ढग नसून पांढराशुभ्र धुकं आहे हे मला नंतर समजलं.दूरवर हिरवीगार घनदाट झाडी यांनी तो परिसर नटला होता. आमची गाडी डोंगर बाजूने पोखरुन तयार केलेल्या रस्त्यावर डोंगरमाथ्यावरुन चालत होती.अतिशय कठीण वळंण थोड्याथोड्या अंतरावर अचानक ब्रेक दाबावयास भाग पाडत होती.ब्रेक दाबताच झटक्याने मी सीटवर पुढे मागे ढकलल्या जात होतो. थोडंसं अंतर पुढे गेल्यावर खूप खोलवर खाली वाहत येणारे ओहळ छोट्या नदीला येऊन मिळत होते.भाताची शेती आणि कौलारू वस्त्यांचे गाव दिसत होतं . आणि मनात एक प्रश्न आला,'एवढ्या खोल दरीत चारी बाजूंनी डोंगर असलेल्या ठिकाणी ही वस्ती कशी वसली असेल?इथली माणसं कशी राहत असतील?या गावाला रस्ता कुठून गेला असेल?इथं माणसं कशी राहत असतील?'हे प्रश्न मनात येणं तसं साहजिकच होतं कारण, आमच्या बीड जिल्ह्यात विशेषतः अंबाजोगाई- लातूर परिसरात असले अवघड घाट,एवढे उंच डोंगर आणि खोल दऱ्या मी पाहिलेल्या नव्हत्या.सपाट जमिनीवर असलेले सरळ व वळणदार रस्ते ,एखादा माळ आल्यास थोडासा चढ उतार इतकंच.
मनात या रस्त्याची भिती वाटत होती.मला मळमळ होत असल्याने मी बप्पाला म्हणालो,
"बप्पा ,मळमळ व्हायलंय, आवळासुपारी हाय का? आणखी किती वेळ लागंल रत्नागिरी ला पहुंचायला?"
बप्पांनी आवळा सुपारी दिली.मी समोर बोर्ड वाचला,' घाट समाप्त' माझ्यासाठी नकोनकोसा वाटणारा तो 'आंबाघाट' संपला होता. पांचाळ चे अण्णा आणि पांचाळ दोघेही आता जागे झाले होते.
"लयं लांब हाय बाबा रत्नागिरी, आणखी एक तास लागतंय म्हणं आणि ही रस्तेसुद्धा लईच धोकादायक दिसाय लागलेत."
अण्णा बोलतं होते.अण्णांची अन् बप्पांची दोघांची कालंच पुण्यात दुसऱ्या राऊंडच्या शेवटी पत्र घेताना ओळख झाली होती.हिंगोली जिल्ह्यातील जवळाबाजारजळ त्यांच
गाव असल्याने ,बप्पानी त्यांना जवळाबाजारच्या आमच्या पाहुण्यांच्या ओळखी सांगितल्या होत्या.रस्ता कटत होता.
कधीही न पाहिलेली झाडं मी पाहत होतो. ( फणसं,काजू, सुपारी इ..) आपल्या गावाकडं डोंगरात बाभळ आणि कडूनिंबाची झाडं कुठंही येतात ,तशी आंब्याची झाडे त्या माळावर जिकडं पाहील तिकडं दिसतं होती.त्यातच नवल म्हणजे गावाकडची आंब्याची झाडे ही खूप मोठ्या बुडाची असतात .त्याच्यावर चढायला एक वेगळी मजा येते.परंतू या आंब्याच्या फांद्या तर जमिनीतूनंच
वेगवेगळ्या बाजूंनी पसरलेल्या होत्या.आंबे लागल्यानंतर हातानेच आंबे सहज तोडून घेता येत असावीत.याच्या फांद्यांना काठ्या का लावल्या आहेत? ते मला समजत नव्हतं. अतिशय छोटीछोटी आकाराची शेतं(गावाकडंच्या एका एकरचे चार भाग करावेत एवढी) आणि त्यात डोलणारी साळं(भातशेती)दिसत होती.ज्वारी ,तूर, कापूस,ऊस यासारखी पिके त्या रानात नव्हती.पुन्हा मनात प्रश्न 'इथले लोक चपात्या , भाकरी खात नसतील का? फक्त भात मासेच खातात की काय? 'या सगळ्या प्रश्र्नांची उत्तरे तिथला एखादा स्थानिकचा माणूस देऊ शकला असता पण शेजारी बप्पा आणि पुढच्या सीटवर पांचाळ व त्याचे वडील,मग विचारा कुणाला?या सर्व प्रश्र्नांची उत्तरे मला नंतर मिळाली.
कंडक्टर ने बेल दिली,,'चला शिवाजीनगर आलं,उतरून घ्या'.आम्ही चौघेजण उतरलो.सकाळी सात वाजताची वेळ ,निर्जन रस्ता, बसस्टॉपवर कुणीही नाही; आता 'स.रा.देसाई अध्यापक विद्यालय शिवाजीनगर' हा पत्ता शोधणार कसा?आम्ही रस्त्याने चालत थोडंसं पुढे आलोत . रस्त्यावर झाडलोट करणारी एक व्यक्ती भेटली.आम्ही त्या व्यक्तीला पत्ता विचारला.तो म्हणाला,"तुम्ही खूप लांब उतरला आहात, इथून माळनाका खूप लांब आहे.तुम्ही माळनाक्याला उतरायला हवं होतं".आता आम्हाला कुठं माहित की माळनाका नावाचा बसस्टाॅप आहे.आम्ही आपलं शिवाजीनगर पत्त्यात दिलं होतं , शिवाजीनगर हा प्रमुख भाग असावा म्हणून कंडक्टरला शिवाजीनगर सांगितलं,माळनाका सांगितलं असतं तर त्यानं माळनाक्यावर उतरलं असतं .आम्ही चालतं होतो ,मागून एक रिक्क्षा आली .आम्ही कॉलेजच्या सांगितलेल्या पत्त्यावर त्यानं आम्हाला आणून सोडलं.' स.रा.देसाई.अध्यापक विद्यालय' असा फलक असलेली दोन मजली इमारत उभी होती.माझं भविष्य घडविण्यासाठी मला ती आपल्याकडे बोलवित होती.इमारत पाहिल्यानंतर मला कॉलेज आवडलं होतं.सामान घेऊन आम्ही आता कॉलेज उघडण्याची वाट पाहत बसलो होतो.मनात विचार येत होता कि,एवढ्या लांब आपल्या ओळखीचं कोणी भेटेल का?गावाजवळच आपल्या तालुक्यातील कोणी असेल का?असे निरनिराळे प्रश्न मनात येत होते.कॉलेजमागच्या कॅन्टीनमध्ये नाश्ता केला.गप्पागोष्टीमध्ये वेळ निघून गेला.कॉलेजची घंटा वाजली आ णि प्रार्थनासुद्धा झाली.
आम्ही प्राचार्याच्या कॅबिन समोर वाट पाहत उभे राहिलो होतो इतक्यात माझ्या नावाने मला बोलावणे आले मी व माझे वडील केबिनमध्ये गेलो .प्राचार्य प्रताप सावंतदेसाई ही नेमप्लेट मी वाचली . सावंत आणि देसाई ही दोन आडनावे एकत्र कशी काय जोडली गेली याचं मला आश्चर्य वाटलं होतं.असो माझी कागदपत्रे सरांनी बघितली आणि खूप कडक शब्दात इथले नियम समजावून सांगितले .
मला सावंत देसाई सर म्हणजे खूप कडक शिस्तीचं व्यक्तिमत्त्व आहे, याची जाणीव झाली 1700 रुपये फीस भरा असं सरांनी सांगितल्या वर माझे वडील बप्पा नम्रपणे म्हणाले,
"सर मी गरीब मजूर माणूस कॉलेजला फीस आहे याची मला माहिती नव्हती. मी पुढच्या येळंला आल्यावर सगळी फीस भरून टाकतो. माझ्या मुलाला अॅडमिशन द्या." 'असं करता येणार नाही, तुम्ही क्लर्कच्या केबिनमध्ये जाऊन बघा.सर्व मुलांना फिस भरूनच अॅडमिशन दिलं आहे.तुम्हाला सवलत देता येणार नाही".बप्पांनी खूप विणवणी करून हतबलता दाखविल्यावर सरांनी पाचशे रुपये भरुन अॅडमिशन घेण्याची परवानगी दिली.आता राहण्याचा प्रश्न होता.
"साहेब आमी खूप लांबचे माणसं इथं आमच्या वळखीचं कुणीच न्हाई.आमची राहण्याची सोय कुठं होईल?"बप्पांनी शंका विचारली.
"काळजी करू नका". सरांनी दाभाडे नावाच्या एका मुलाला बोलवावयास सांगितले. उंचापुरा, गोरापान, सरळ नाक असलेला पायात चप्पल न घातलेला एक तरुण आमच्यासमोर हजर झाला."दाभाडे,हे तुमच्या गावाकडची माणसं आहेत, यांच्या राहण्याची व्यवस्था कर"दाभाडे आम्हाला घेऊन निघाला होता.गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी हे दाभाडेचं गाव.माझ्या आजोळपासून जवळ आहे.त्यामुळे वडीलांना दाभाडे कितीतरी जवळचा वाटत होता.आणि त्यावेळी मी विचार करीत होतो कि यानं पायात चप्पल का घातली नाही.आम्ही त्याला तसं विचारण्याचा प्रयत्नही केला नाही.आम्ही त्या व्हरांड्यातून पुढे निघालोत . माझ्या सारखंच नवीन अॅडमिशन घेतलेले दोन मित्र भेटले.त्यांनी आम्हाला विचारलं ,"कोठून आलात?"आम्ही बीड असं सांगताच त्यांच्यातला तो ढोल्या मित्र म्हणाला,"आम्ही दोघेही माजलगावचे".तो शरीराराने खात्यापित्या घरचा मुलगा सांगू लागला," लय बेकार इतं राहणं राव ,मेसवर नुसता भात वाडायल्याय ती बाई ,माझं काई पोट भरणायं.काका इथं दोन दोन दिवस अंडरेली वाळणात .कपडे धुतले तर चार दिवस वाळत न्हाईत.उगंचच आम्ही एवढ्या लांब आलोत? मला मिचवल भेटलं तर मी जाणाराय." असं बोलणारा हा मित्र सेकंड इयरला माझा रुम पाटनर होता.सचिन गरड हे त्याच नाव.सचिनच्या बोलण्यान माझी बेचैनी वाढली.कॉलेजमध्ये अनेक सिनियर मित्र भेटले. प्रत्येक जण आपुलकीने विचारपूस करत होता.
आम्ही थिबा पॅलेसकडे जाणाऱ्या रस्त्यावर पायी चालत असताना समोरून एक मित्र आम्हाला भेटला.तो कॉलेजला निघाला होता.नाव गाव विचारल्यावर ,"बनाजी महात्मे बीड ",असं तो म्हणाला.एकंदरीत वातावरण पाहता मला बीडची हवा इथंसुद्धा आहे हे जाणवलं.बनाजी म्हणाला,"आतापर्यंत बीडचे दहा जण आले आहेत." सिनीयर फस्ट इयर आणि सेकंड इयर दोन्ही मिळून वीस पेक्षा जास्त बीडचे आहेत .ही माहिती मला समजली.आति माझ्या वडीलांची तसेच माझीही काळजी मिटली होती.आम्ही मनोज जोशीच्या रुमवर पोहोचलो.तिथं संतोष सरवदे,मनोज जोशी,रामाहारी गित्ते आणि दत्ता पवार या मित्रांच्या भेटी झाल्या.संतोष सरवदे म्हणजे कुणी प्राध्यापक भेटीला आले असावेत असं वाटलं परंतु तो माझा गैरसमज होता.मनोज जोशीचं आत्मविश्वासानं बोलणं, गावाकडच्या मित्रांना जवळ करणं या गोष्टी मला खूप आवडल्या.पावसाच्या बारीक सरी चालू होत्या.इथं पाऊस चार महिने उघडत नाही .ही माहिती मला या मित्रांकडून मिळाली."काका तुम्ही काही काळजी करु नका.तुमच्या मुलाला रुम बघून द्यायची,त्याचं कमी जास्त पहायची जबाबदारी माझी आहे.तुम्ही बिनधास्त रहा." जोशीचं हे बोलणं माझ्या वडीलांची सर्व काळजी मिटवणारं होतं.
थोड्या गप्पा झाल्यावर दुपारचे चार वाजले होते.आदोन दिवसांनंतर सर्व सामान घेऊन येतो असं त्यांना सांगून आम्ही त्यांचा निरोप घेतला.चारची बस निघून गेली होती. पाच वाजताची कोल्हापूर आम्हाला सापडली.येताना वाटेत पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घेतलं आणि दुसऱ्या दिवशी रात्री दहा वाजता गावात पोहोचलो.पोथी सुटली होती आणि रामराव गुरुजींचा वैजू घराजवळ भेटला आणि म्हणाला,"काय मास्तर पेढे कधी द्यायचेत" वैजूने पहिल्यांदा मास्तर म्हणून मारलेली हाक मला आजही जशाला तशी आठवते. त्यानं मारलेल्या त्या हाके बरोबर माझं मास्तरकीचं लायसन पक्कं झालं होतं. ---
© सिद्धेश्वर इंगोले.
9561204691 ___________________________