Insight Academy

Insight Academy ग्रामीण भागातील युवक युवतींचे सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न साकारणे हेच आमचे ध्येय आहे.

 #वाढदिवसविशेष सांप्रत काळामध्ये चांगली माणसं मिळणं अतिशय कठीण झाल आहे. आयुष्य नाकासमोरून जगणारी भावनिक संवेदनशील अशी मा...
04/10/2025

#वाढदिवसविशेष
सांप्रत काळामध्ये चांगली माणसं मिळणं अतिशय कठीण झाल आहे. आयुष्य नाकासमोरून जगणारी भावनिक संवेदनशील अशी माणसं आताशा दुर्मिळच. चालू जगराहाटीत अशा माणसांचा आपल्याला लाभ मिळणं म्हणजे पूर्व जन्माचे पुण्यच म्हणा. रस्त्या रस्त्याने मोठ मोठाले बॅनर लावलेले आणि ठळक अक्षरात अधोरेखित केलेले "आमचं काळीज", "दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस" आणि त्यांचे शुभेच्छुक चौका चौकात हुल्लडबाजी करत, ओरबाडून केक कापणारे आणि भरवणारे आणि कसल्याशा उन्मादात Eeewwww करणारे पाहिले की "कीव " येते. आम्ही त्यातल्या त्यात भाग्यवान की असले पार्टी पुरते मित्र आम्हाला मिळाले नाहीत.
साधारण पंधरा वर्षांपूर्वी दिल्लीत असताना, माझ्या आईचा वाढदिवस साजरा करण्याकरता चल मी पण येतो तुझ्याबरोबर रक्तदान करायला म्हणून मलाच पुढे घालून नेणारा आमचा मित्र गिरीश म्हणजे खऱ्या अर्थाने "दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस" आहे.
असं म्हणतात की स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना तुमच्या सोबत असलेले तुमचे सोबती हेच आयुष्यभराचे मित्र बनतात त्या काळातील ही कमाई आयुष्यभरासाठी उपयोगाला येते आणि आमच्या बाबतीत तर ते तंतोतंत खरे ठरले आहे कारण आम्हाला या कमाईतून मिळाला तो आमचा प्रिय मित्र गिरीश. स्पर्धा परीक्षांमध्ये अति संवेदनशील किंवा अति भावनिक एस्पायरंट्स जास्त काळ तग धरू शकत नाहीत तसेच काहीसे आमच्या या मित्राच्या बाबतीत झाले असावे, पण माणूसपणाची एखादी स्पर्धा परीक्षा असेल तर त्यात हा आमचा मित्र मेरिटमध्ये येऊन रँकर होईल यात काही दुमत नाही.
वटवृक्षाच्या छायेखाली इतर रोपांची वाढ खुंटते त्याचप्रमाणे घरामध्ये सरकारी अधिकारी असणाऱ्यांची मांदियाळी असल्याने आमचा हा मित्र त्यातून प्रेरणा घेऊन पुढे जाण्यापेक्षा प्रेशर घेऊन स्थायी झाला हा भाग अलाहिदा. सध्या बांधकाम क्षेत्रामध्ये आपले नशीब आजमू पाहणार आमचा मित्र उत्तर उत्तर नवीन शिखरे काबीज करत राहील हा आमचा दृढ विश्वास आहे.
या आमच्या मित्राचे चाळिशीकडे मार्गक्रमण सुरू असून देखील आजही कुठे यायचे जायचे म्हणले की याचे उत्तर असते घरी विचारून सांगतो. असे जरी असले तरी मित्रांच्या अडीअडचणीमध्ये भक्कमपणे त्यांच्या सोबत उभा राहत त्यांच्या सुखात दुःखात सहभागी असणारा हा आमचा मित्र आताशा फार भेटत नाही ही एक सल आहेच.
इन साईट अकॅडमी च्या माध्यमातून ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे, स्पर्धा परीक्षांचे वास्तव समजून सांगणे, आणि त्यांना लागेल ती मदत करत राहणं हा आमच्या मित्राचा आणि एक स्वभाव गुण.
मर्द को कभी दर्द नही होता अशा अर्थाचे चेहऱ्यावरती भाव सतत दाखवणारा आमचा मित्र आतून मात्र फणसाच्या गऱ्यांसारखा आहे. आज त्याचा वाढदिवस त्याने त्याच्या मधील हा गोडवा असाच पसरवावा हीच इच्छा.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळामध्ये अशी भावनांनी ओतप्रोत भरलेल्या आणि भारावलेल्या दुर्मिळ प्रजातींच्या माणसांचं खरंतर IUCN सारख्या संस्थांनी संवर्धन करावं नाहीतर ही माणसं विलुप्त होतील अशी भीती आहे. कदाचित जवळच्या माणसांना अशांची किंमत सहसा नसते आमच्या सारख्या मित्रांना मात्र ती किंमत ठाऊक आहे.
अशा आमच्या प्रिय मित्राला त्याच्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा.
लेखक:
गिरीशच्या असंख्य मित्रांपैकी एक.
Sonali Kolhe Yaminee Kashid-Nikam Girish Nagane Abhijit Uddhavrao Nikam

आपल्या मुलास कोल्हापूर दरबाराची दरमहा दहा रूपयांची स्कॉलरशिप मिळतेय हे कळल्यानंतर तातडीने कोल्हापूरला येऊन त्या रकमेतील ...
14/05/2025

आपल्या मुलास कोल्हापूर दरबाराची दरमहा दहा रूपयांची स्कॉलरशिप मिळतेय हे कळल्यानंतर तातडीने कोल्हापूरला येऊन त्या रकमेतील फ्क्त दोन रूपये त्याला खर्चासाठी ठेवायला सांगून उर्वरित आठ रूपये आपल्या सार्वजनिक संस्थेमध्ये जमा करायला सांगणारे ते एकमेव संस्थाचालक वडील असावेत. आपली स्वतःची इतकी मोठी शिक्षणसंस्था असूनही मुलाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उद्भवला तेंव्हा मुलाला पाठविलेल्या पत्रात ते म्हणतात,"तू संस्थेमध्ये नोकरी करू नये अशी माझी पहिल्यापासून इच्छा होती व आजही आहे. ज्या संस्थेच्या स्टोअर्समध्ये तु काम करीत आहेस त्या स्टोअर्सला चालू साली फारसा नफा झालेला नाही व यापुढेही मुळीच होणार नाही. त्यामुळे स्टोअर्सला नोकर कमी करावे लागतील त्यात तुला कमी न करता दुसऱ्यास कमी करावे लागेल हे स्वभाविक आहे. अशावेळी तू होऊन नोकरी सोडावीस व विमा कंपनीचा अगर, इतर धंदा तू करावा अशी माझी तुला प्रेमाची सूचना आहे."
या घटनेतून कर्मवीरांच्या तत्त्वनिष्ठेचे आणि त्यागाचे दर्शन घडते. (repost)

'छत्रपती शिवाजी कॉलेज' हे संस्थेचे पहिले मोफत व निवासी कॉलेज त्यांनी 1947 मध्ये सातारा येथे सुरू केले. तेव्हा शिवरायांच्या नावावरून काही मंडळींनी शंका उपस्थित केली होती त्यावेळी त्यांनी काढलेले उद्गार त्यांच्याविषयी सर्व काही सांगून जातात. ते म्हणाले होते, "प्रसंगी जन्मदात्या बापाचे नाव बदलेन पण कॉलेजला दिलेले शिवाजीराजांचे नाव मी कधीच बदलणार नाही."

त्यांनी उभ्या केलेल्या संस्थेवर, आजीव सदस्य म्हणून संस्थेस वाहून घेण्याचा शपथ सोहळा महर्षी विठ्ठल रावजी शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी महर्षी म्हणाले होते की, "देवांनी पुष्पवृष्टी करावी असा हा सोहळा आहे. 'याची देही याची डोळा' हे जे सुख यांना लाभले ते मला लाभले नाही. समाजसेवा अक्रोडाच्या झाडासारखी असते. झाड लावणाऱ्यास फळ खावयास मिळत नाही. यांनी लावलेल्या रोपट्याचा महान वृक्ष झाला व त्याची फळेही त्यांना चाखता आली."

भाऊरावांनी कराडमध्ये सुरु केलेल्या 'सदगुरू गाडगे महाराज कॉलेज'ची अनामत रक्कम भरण्यासाठी पुण्याच्या मंडईतील लोकांनी त्याकाळी तब्बल 25000 /- रु. जमा करून दिले होते! लोकांचा इतका अफाट विश्वास होता त्यांच्यावर!
'स्‍वावलंबन शिक्षण हेच आमचे ब्रीद' असे ब्रीदवाक्य ज्यांच्या संस्थेचे होते त्या कर्मवीर भाऊराव पाटलांची जीवनगाथा अत्यंत रोमांचकारक तर आहेच पण त्यात नाट्यमय घटना देखील आहेत. आज कर्मवीरांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा आपल्या आयुष्याला प्रकाशमय करून जाईल ....

मुळचे कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री या आडवळणाच्या गावचे रहिवासी असणाऱ्या, एका जैनधर्मीय कुटुंबातल्या पायगोंडा आणि गंगुबाई या दांपत्याच्या पोटी, कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी 22 सप्टेबर 1887 रोजी एका मुलाचा जन्म झाला, त्यावेळेस त्या मातापित्यांना वाटले सुद्धा नसेल की, आपला हा मुलगा ऐतिहासिक असं समाजकार्य करून आपलं नाव अजरामर करेल. त्या मुलाचे नाव भाऊराव! आपल्या अलौकिक व ऐतिहासिक अशा समाजकार्यामुळे हा मुलगा पुढे कर्मवीर भाऊराव पाटील म्हणून जनमाणसाच्या हृदयात विराजमान झाला…

कर्मवीरांचे पूर्ण नाव भाऊराव पायगौंडा पाटील. कर्मवीरांचे पूर्वज नशीब आजमवण्यासाठी दक्षिण कन्नड मधून महाराष्ट्रात आले व ऐतवडे बुद्रुक जि. सांगली येथे स्थिरावले. पुढे त्यांच्या घराण्यात पाटीलकी आली. त्यामुळे त्यांचे मुळचे देसाई हे आडनाव जाऊन पाटील हे आडनाव रूढ झाले.

कर्मवीर अण्णांचे लग्न त्यांच्या वयाच्या पंचविसाव्या वर्षी लक्ष्मीबाई यांच्या बरोबर झाले. त्यावेळी त्यांचे वय 12 वर्षांचे होते. लक्ष्मीबाईंचे माहेरचे नाव आदाक्का असे होते, त्यांचे माहेर कुंभोजचे. माहेरचे आडनाव पाटील होते, जे एक प्रतिष्ठित व श्रीमंत घराणे होते. लग्नात त्यांच्या वडिलांनी आपण होऊन लक्ष्मीबाई यांना 120 तोळे सोन्याचे दागिने केले होते. हे दागिने पुढे लोकशिक्षण आणि वसतिगृहे यावर खर्ची पडले हे वेगळे सांगायला नको. आपले शिक्षण सोडल्यानंतर कर्मवीर अण्णा कोरेगावला आले; कारण त्यावेळी त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई या कोरेगावात होत्या. याच काळात कर्मवीरांच्या जीवनाला कलाटणी मिळणारी घटना घडली. कार्यक्रमा निमित्त घरी पाहुणे मंडळी आली होती. जेवणाचा बेत होता. पाहुणे मंडळी जेवायला बसली. कर्मवीरांची पत्नी लक्ष्मीबाई वाढत होत्या. गप्पा सुरू होत्या. एका पाहुण्याने विचारले, "आपले चिरंजीव भाऊराव काय काम करतात?"
भाऊरावांचे वडील म्हणाले. “काही काम करत नाही, तो एकच काम करतो. दोनवेळ जेवणाचं व गावभर फिरण्यांचं!" बायकोच्या देखत झालेला अपमान भाऊरांवाच्या जिव्हारी लागला. त्यांच्या पत्नीचेही डोळे भरून आले. त्या भाऊरावांना वाढत होत्या. त्यांच्या डोळ्यातले थेंब भाऊरावांच्या ताटात पडले. कर्मवीर जेवत्या ताटावरून उठले. मनाचा निश्चय केला. काहीतरी करून दाखवलेच पाहिजे असा मनाचा निर्धार करून, तडक कोरेगाव ते सातारा अंतर पायी चालत आले. खिशात पैसा नव्हता. पूर्वी मुंबईच्या माणिकचंद पानाचंद या जवाहिऱ्याकडे मिळालेले काम आपण सोडून आलो हा मूर्खपणा केला असे त्यांना वाटू लागले. त्यावेळी त्यांना एक कल्पना सुचली, शिकवण्या घेण्याची! त्यांनी तसा संकल्प सोडला. भाऊरावांच्या अंगी एक गुण होता.एखादी गोष्ट मनावर घेतली की त्या गोष्टीचा पिच्छा पुरवायचा. मग कितीही कष्ट पडोत. शिकवणी वर्ग सुरू केले. हळूहळू मुले वाढू लागली, बोलता बोलता मासिक उत्पन्न 90-95 रूपयांपर्यंत गेले. पुढे उभयता दोघेही साताऱ्याला आले.

अगदी संस्कृतच्या शिकवण्याही त्यांनी घेतल्या आणि त्यात त्यांच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळू लागले, अण्णांकडे जिद्द व चिकाटी असल्यामुळे हे शक्य झाले. त्याकाळी मुलांना शिक्षणासाठी दूरगावी जावे लागे. मुलांची राहण्याची सोय व्हावी म्हणून कर्मवीर अण्णा, मदृवाण्णा मास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर इ. मंडळीनी १९१० साली ‘दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे वसतीगृह, पेठ नेर्ले या गावी सुरू करण्यात आले. दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ हेच रयत शिक्षण संस्थेचे मूळ रोपटे होय.

14 फेब्रुवारी, 1914 च्या रात्री कोल्हापुरात सातवा एडवर्ड व व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्याला डांबर फासले गेले. वसतीगृहातील मुलांना फूस लावून, कर्मवीरांची वसतीगृहातून हकालपट्टी करणारे, वसतीगृह प्रमुख लठ्ठे यांनी हे कृत्य केले असा बनाव करण्यात आला. कर्मवीरांनी त्यांच्या विरूध्द साक्ष द्यावी म्हणून त्यांचा छळ करण्यात आला. कर्मवीरांनी खोटी साक्ष देण्याचे नाकारले. ‘एक वेळ मरण पत्करेन, पण खोटी साक्ष देणार नाही.’ असे कर्मवीरांनी सांगितले. शेवटी त्यांची निर्दोष सुटका झाली व ते विट्याला गेले. त्यानंतर कर्मवीरांनी ओगले ग्लास वर्क्समध्ये काम सुरू केले. पुढे लक्ष्मणराव किर्लोस्करांनी नांगराचा कारखाना काढला. त्या कारखान्यात ते प्रचारक म्हणून काम करू लागले. यामुळे फिरती सुरू झाली. कर्मवीरांनी महाराष्ट्र पायाखाली घातला. लोकांचे दारिद्र्य डोळ्यांनी पाहिले. अज्ञान हे दारिद्र्याचे मूळ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. लोकांना सज्ञान केले पाहिजे याची जाणीव झाली. दरम्यानच्या काळात कर्मवीरांनी कूपर कारखान्यात नोकरी सुरू केली. कामावर रूजू होताना कूपरने निव्वळ नफ्याच्या 10 टक्के भाग कर्मवीरांच्या बोर्डिंग विकासासाठी देण्याचे वचन दिले होते. ते कूपरने न पाळल्यामुळे कूपरशी भांडण करून त्यांनी ती नोकरी सोडली व पूर्णवेळ शैक्षणिक कार्याला वाहून घेतले.

राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला आदर्श मानून आपले जीवन व्यतीत करणाऱ्या भाऊरावांवर महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या विचारांचाही खूप प्रभाव होता. महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक चळवळीचे कामही कर्मवीरांनी पुढे चालू ठेवले होते. 4 ऑक्टोंबर, 1919 रोजी (विजयादशमी) काले, जि. सातारा येथे सत्यशोधक समाजाची मोठी परिषद भरली होती. या परिषदेत कर्मवीरांनी ‘रयत शिक्षण संस्था’ स्थापण्याची घोषणा केली. त्यासाठी वसतिगृह सुरू केले. 1908 साली कर्मवीर अण्णा, ‘मिस क्लार्क होस्टेलच्या’ नामकरणाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. अस्पृश्यांसाठी हे वसतिगृह राजर्षी शाहू महाराजानी सुरू केले होते. तेथे सर्व जातीधर्मातील लोक उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर कर्मवीर वसतिगृहात आले. वसतिगृह प्रमुखांनी त्यांना आंघोळ करून वसतिगृहात येण्याची ताकीद दिली. अर्थात कर्मवीरांनी ते जुमानले नाही. “मी सकाळी आंघोळ केली आहे. व पुन्हा आंघोळ करणार नाही, दलित देखील माणसेच आहेत, घरात कुत्री, मांजरे आलेली चालतात आणि मग माणसांचाच विटाळ कसा होतो? आंघोळ केल्यावर विटाळ कसा काय जातो?”
असलं परखड सत्य पचत नाही. बेशिस्त वर्तनाबद्दल कर्मवीरांना बोर्डिंगमधून काढून टाकण्यात आले. आपली मते ते ठामपणे मांडत आणि त्यावर ते निश्चयपुर्वक अंमल करत असत. याचे मुळ त्यांच्या बालपणात आहे. अगदी किशोर वयातच त्यांचा स्वभाव बंडखोर होता. कर्मवीरांच्या बालपणी कुंभोज भागात ‘सत्याप्पाचे बंड’ हे प्रकरण खूप गाजले. कुंपणाच्या काट्या तोडणाऱ्या एका दलित गरोदर बाईला एका माणसाने जनावरासारखे मारले. सत्याप्पा भोसलेला त्याचा सात्विक संताप आला, रागाच्या भरात त्याने त्या माणसाला ठार केले व तो फरारी झाला. तो कर्मवीर अण्णांच्या आजोबांच्या ऊसाच्या फडात लपून बसे. छोट्या भाऊरावांना तो अंगाखांद्यावर खेळवायचा! पराक्रमाच्या गोष्टी सांगायचा. बंडखोरी, सत्यनिष्ठा, अन्यायाविरूध्द चीड हे सदगुण सत्याप्पाकडून भाऊरावांना मिळाले. त्यामुळेच अन्याय झाल्यास त्यांना संताप येत असे. त्यांचे प्राथमिक शिक्षण विटा येथे झाले. त्यानंतर विद्यालयीन शिक्षण राजाराम हायस्कूल- कोल्हापूर येथे झाले. ते जैन बोर्डिंगमध्ये राहात होते. त्याकाळात ते शाहू महाराजांच्या कार्याने आणि विचारांनी भारावून गेले होते.

रयत शिक्षण संस्था स्थापण्यामागील महत्त्वाचा उद्देश म्हणजे, मागासवर्गीयांना विनाशुल्क शिक्षणाच्या संधी निर्माण करणे, सर्व जाती-धर्मांच्या मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करून सामाजिक सुधारणांसाठी जुन्या कालबाह्य प्रथा, रूढी- परंपरा, चालीरीती बंद करणे. एकत्र काम करण्यावर भर देऊन विद्यार्थ्यांना चांगले वळण लावताना संस्कार देणे. विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे महत्व पटवताना त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हे करत असताना शैक्षणिक शाखांचे विशाल विस्तारीकरण करून अनेकांना शिक्षणाच्या, रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे मोठे कार्य कर्मवीरांनी एखाद्या व्रतस्थ योग्याप्रमाणे पार पाडले. त्यामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक व शैक्षणिक पटलावर त्यांचा जो अद्भुत ठसा उमटला तो आजही अबाधित आहे.

या सर्व कार्यात त्यांना पत्नी लक्ष्मीबाई यांची अगदी मोलाची साथ लाभली. त्या अगदी खंबीरपणे आपल्या पतीच्या पाठीशी राहिल्या, त्यांची सुखदुःखे त्यांनी आपली मानली. त्यांचा स्वभावदेखील कर्मवीरांसारखाच होता याची प्रचीती देणारी एक घटना सांगावीशी वाटते. एकदा निवासी वसतीगृहातील एक मुलगा आजारी पडला होता. कर्मवीर बाहेरगावी होते. लक्ष्मीबाई त्या मुलाची देखभाल करीत होत्या. याचवेळी लक्ष्मीबाईंच्या घरून तार आली, “आई फार आजारी आहे; लवकर निघून यावे.” लक्ष्मीबाईंनी उलट तार केली, “वसतीगृहातील माझा मुलगा फार आजारी आहे. भाऊराव बाहेरगावी गेले आहेत. ते आले की मी येईन.” कर्मवीर आल्यानंतर लक्ष्मीबाई आपल्या आईंना भेटायला गेल्या. आपल्या कार्यालाच आपलं कुटुंब मानण्याचा त्यांचा हा दुर्मिळ वत्सलभाव त्यांच्या कर्तुत्वास बहर आणण्यास खूप उपयुक्त ठरला. वसतीगृहातल्या मुलांवर भाऊरावांची मायेची पाखर असे. भाऊराव वसतीगृहात राहत असत. मुलांचे जेवण व्यवस्थित होते की नाही, मुले अभ्यास करतात की नाहीत, पहाटे उठतात की नाहीत हे जातीने पाहत असत. कर्मवीर मध्यरात्री उठत. हातामध्ये कंदील घेऊन झोपलेल्या मुलांमधून हिंडत. ज्यांच्या अंगावरील पांघरूण बाजूला पडलेले असे त्यांच्या अंगावर पांघरूण घालीत. काही मुले अंथरूणाखाली जात. त्यांना अंथरूणावर घेत. दिवा तसाच ठेवून अभ्यास करता करता झोपी गेलेल्या मुलांच्या उशाचा दिवा विझवून बाजूला ठेवीत. एके दिवशी एक मुलगा असाच उघडा पडला होता. त्याची उलघाल झालेली कर्मवीरांनी पाहिली. त्याच्या अंगात ताप भरलेला होता. कर्मवीरांनी त्याला आपल्या अंथरूणात घेतले. त्याला पांघरूण घातले. वसतीगृहातील काही मुलांना आई नव्हती. काहींना वडील नव्हते. सौ. वहिनी व अण्णांनी त्यांना आईवडिलांची उणीव कधीच भासू दिली नाही.

भाऊरावांनी शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थी घडवताना इतर शिक्षणावर भर दिला. सर्वांगीण विद्यार्थी घडवून त्यांच्या श्रमाचे चीज व्हावे यासाठी ते जन्मभर झगडले. शिक्षण संस्था आणि वसतिगृहे चालवताना अनंत अडचणी आल्या; परंतु त्यातून मार्ग काढत ते पुढे गेले. दिनांक 25 फेब्रुवारी 1927 रोजी सातारा येथील वसतिगृहाचे 'छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस' असे नामकरण महात्मा गांधींच्या हस्ते झाले. कर्मवीरांच्या अद्वितीय कामावर प्रसन्न होऊन गांधीजींनी दरवर्षी 500 रु.ची देणगी हरिजन सेवक फंडातून देण्यास सुरवात केली. 16 जून 1935 मध्ये रयत शिक्षण संस्थेची अधिकृतपणे त्यांनी नोंदणी केली. त्याच वर्षी त्यांनी सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज सातारा येथे सुरू केले. त्यानंतर महाराजा सयाजीराव हायस्कूलची सातारा येथे सुरूवात केली. हे हायस्कूल विनाशुल्क पद्धतीचे आणि ‘कमवा व शिका‘ या योजनेवर आधारित होते. त्यानंतर १९४७ मध्ये त्यांनी अशा प्रकारची अनेक हायस्कूल सुरू केली आणि शिक्षणाची कवाडे ग्रामीण महाराष्ट्रात उघडली गेली. सन 1954 मध्ये त्यांनी सातारा येथे छत्रपती शिवाजी कॉलेज सुरू केले. त्यानंतर लगेचच कऱ्हाड येथे संत गाडगेबाबा कॉलेज सुरू केले. सन 1955 मध्ये चांगले शिक्षक घडवण्याच्या उद्देशाने, मौलाना आझाद यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सुरू केले. त्यांचा प्रमुख उद्देश शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याचा होता.

सामाजिक कार्य करताना त्यांच्या मनावर महात्मा फुलेंचा जबरदस्त प्रभाव होता. भाऊराव पाटील यांनी सर्व जाती-धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी 38 वसतिगृहे असलेल्या शाळा आणि हायस्कूल सुरू केली, तसेच 578 शाळा, सहा ट्रेनिंग कॉलेज, 108 हायस्कूल आणि तीन महाविद्यालये सुरू केली. महाराष्ट्रातील लोकांनी त्यांना "कर्मवीर' ही पदवी दिली. कृतिशील राजा असाच त्याचा अर्थ आहे. रयत शिक्षण संस्था ही तिच्या बोधचिन्हांसारखीच आपली पाळेमुळे खोलवर असणारया एखाद्या विस्तीर्ण वटवृक्षासम सकळ महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रावर आपली विशाल छत्रछाया देऊन आजही नम्रतेने उभी आहे. 1959 मध्ये कर्मवीर भाऊरावांना पुणे विद्यापीठाने डी.लिट. पदवी देऊन सन्मानित केले. त्याचवर्षी भारत सरकारने पद्‌मभूषण देऊन त्यांना सन्मानित केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अनेकांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवन प्रकाशमय केले. 9 मे 1959 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे देहावसान झाले. ग्रामीण भागातील शैक्षणिक कार्यामुळे, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे दीपस्तंभासारखे जीवन जनतेच्या सदैव स्मरणात राहील. नवीन पिढीला त्यांच्या संघर्षमय जीवनाची आणि कर्तृत्वाची माहिती असणे दिशादर्शक ठरू शकते. पुण्यस्मरणदिनाच्या औचित्याने कर्मवीर भाऊरावांना शतशः नमन....

कर्मवीरांनी उभी केलेली रयत शिक्षण संस्था आता नीतीबाह्य झालीय हे वास्तव आता विस्तवासारखे पोळून काढते. रयत शिक्षण संस्था हा एक तत्वहीन, दिशाहीन बाजार झाला आहे. एकमेवाद्वितीय अशा कर्मवीरांच्या घामरक्तातून उभ्या राहिलेल्या एका उत्तुंग संस्थेची चूड आपण पेटवून देत आहोत हेही आताच्या लोकांच्या गावी नाही ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे! असो.

- Sameer Gaikwad

12/05/2025
अंथरुणावरूनच ‘तो’ झालाय कुटुंबाचा "कणा!"जन्मत:च शारीरिक अपंगत्वामुळे दुसऱ्याच्या आधाराशिवाय जागेवरून थोडाही हलू न शकणारा...
28/03/2025

अंथरुणावरूनच ‘तो’ झालाय कुटुंबाचा "कणा!"

जन्मत:च शारीरिक अपंगत्वामुळे दुसऱ्याच्या आधाराशिवाय जागेवरून थोडाही हलू न शकणारा परीक्षित पीएचडीच्या पहिल्या पायरीवर मात्र यशस्वी झाला आहे. नुकतेच त्याने पीएचडीच्या प्रवेश परीक्षेत पहिल्या प्रयत्नात यश मिळविले आहे. त्याचबरोबर अंथरूणात पडूनच आजवरचे शिक्षण पूर्ण केलेला परीक्षित त्याच्या छोट्याशा कुटुंबाचा आधार बनला आहे. तीन वर्षांपासून तो राजकीय बॉलिवूड कलाकारांसाठी इंटरनेट मार्केटिंग मार्गदर्शक म्हणून काम करत आहे.

दहावीच्या परीक्षेत अंथरूणावर पडून पेपर लिहिणारा पनवेलचा परीक्षित शहा हा मुलगा पहिल्यांदाच प्रकाशझोतात आला. हाडे ठिसूळ असल्यामुळे परीक्षित स्वत:च्या पायावर कधी उभा राहू शकला नाही. ऑस्टिओजेनेसिस नावाचा आजार असल्यामुळे आईच्या आधाराशिवाय परीक्षित एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकत नाही. मात्र अभ्यासात हुशार असल्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा चांगल्या प्रकारे तो शिक्षण पूर्ण करू शकला. आधी दहावी आणि नंतर बारावीच्या परीक्षेत प्रसारमाध्यमात चमकलेला परीक्षित त्यानंतर मात्र पुन्हा दिसलाच नाही. मात्र या कालावधीत परीक्षितने एकाही वर्षांचा खंड न पडता एमएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

कायम प्रथमश्रेणी उत्तीर्ण होणाऱ्या त्याने शिक्षणात बाजी मारली आहेच. मात्र लहानपणीच वडिलांचे छत्र हरविलेल्या परीक्षितला जन्म दिल्यानंतरही पोटातल्या गोळ्याप्रमाणे २५ वर्ष मुलाला सांभाळणाऱ्या आईचा आधार बनला आहे. बीकॉमचे शिक्षण घेत असल्यापासून राजकारणाची आवड असल्यामुळे लॅपटॉपच्या साह्याने अंथरुणात खिळून असलेला परीक्षित सोशल मीडियावरून जगाच्या संपर्कात असायचा. कॉलेजला फक्त परीक्षेसाठी जायचा. अनेकदा मुंबई विद्यापीठाने घरातच सुपरवायझर पाठवून पेपर लिहिण्याची मुभा दिली. अर्थशास्त्र विषयात त्याने पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर अभ्यास यशस्वीपणे पूर्ण केला. त्यानंतर तो मागील तीन वर्षांपासून इंटरनेट मार्केटिंगसाठी काम करतो. चेन्नई येथील मित्राच्या मदतीने एक कंपनी स्थापन करून राजकीय, बॉलिवूड कलाकारांसाठी मार्गदर्शक म्हणून तो काम करतो. या कामामुळे आई आणि परीक्षित या दोघांच्या कुटुंबाला मोठा आर्थिक हातभार लागला आहे.

औषधोपचारामुळे शिवणकाम आणि नातेवाईकांची मदत यामुळे आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या कुटुंबाला परीक्षितच आता आधार ठरला आहे.
डिसेंबर २०१८मध्ये परीक्षितने मायक्रो इकॉनॉमिक्स या विषयात अर्बन डेव्हलपमेंट विषयावर पीएचडी करण्यासाठी मुंबई विद्यापीठाची परीक्षा दिली आणि पीएचडीच्या प्रवेश परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले. त्याचबरोबर लॅपटॉप आणि स्मार्टफोनवर काम करणाऱ्या परीक्षितला कामासाठी दिवसही पुरत नाही. रात्री उशिरापर्यंत काम करीत असतो, अशी माहिती अभिमानाने आई विजयालक्ष्मी दिलीप शाह यांनी दिली. आरबीआयच्या ग्रेड बी च्या पदावर झोनल ऑफिसरपदाची परीक्षा तो देऊ शकतो. याशिवाय कॉलेज व्यवस्थापनाने ठरविल्यास प्राध्यापक म्हणूनही तो काम करण्यास पात्र आहे. आईने हात दिल्याशिवाय कोणतीच कृती करू न शकणारा परीक्षित आणि आई आता एकमेकांना आधार ठरले आहेत.

*संतोष द पाटील*

फिरुनी नवे जन्मेन मी...27 मार्च 2016ला केरळ एक्सप्रेसमध्ये दिल्लीहून सकाळी अकरा वाजता बसलो. आवडती साईड लोवर विंडो सीट मि...
22/03/2025

फिरुनी नवे जन्मेन मी...

27 मार्च 2016ला केरळ एक्सप्रेसमध्ये दिल्लीहून सकाळी अकरा वाजता बसलो. आवडती साईड लोवर विंडो सीट मिळाली होती. गाडी झांशी शहराबाहेर काही मिनिटांसाठी थांबली. समोर उंचावर झांशीचा किल्ला खिडकीतून दृष्टीसमोर होता. खिडकीच्या बाहेर रुळांजवळ छोटंसं तळं होतं. सूर्यास्त व्हायला पाऊण एक तास बाकी असेल. सूर्य झांशीच्या किल्ल्याच्या मागे दडत होता. त्या पिवळ्या केशरी प्रकाशात, ग पाण्याच्या मागे किल्ला अंधारात राकट काळा दिसत होता.

त्या दिवशी वर्ल्डकपमधील सेमी फायनल , भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया डू ऑर डाय मॅच होती. एरवी मी मॅचचे अपडेट्स घेत बसलो असतो. पण माझ्या डोक्यात तेव्हा वेगळे विचार सुरू होते.

इतर कोणत्याही दिवशी समोर किल्ला दिसत असता तर मी मनाने, कल्पनेने राणी लक्ष्मीबाईने किल्ल्यावरून कशी अश्वउडी घेतली असेल याची कल्पना मी करत राहिलो असतो. पण त्या दिवशी झांशीच्या किल्ल्याकडे बघताना एका वेगळ्याच ‘व्यक्तीची’ आठवण मला येत होती. त्याच व्यक्तिबद्दल माझ्या मनात आदल्या दिवशीपासून विचार सुरू होते. मित्राला 'त्या' व्यक्तीबद्दल एक वाक्य ही बोललो होतो..आणि काय आश्चर्य डोळ्यासमोर तेव्हा झांशीचा किल्ला होता. गाडी थांबलेलीच होती.

डोळ्यासमोर व्यक्ती येत होती ती “अरुणिमा सिन्हा”.

23 वर्षाची ही नॅशनल व्हॉलीबॉल खेळाडू मुलगी 12 एप्रिल 2011ला घरून दिल्लीला नोकरीच्या मुलखतीसाठी निघाली. सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन घरातून निघताना तिच्या घरच्यांना किंवा तिलाही कल्पना नव्हती नियतीने तिच्यापुढे काय वाढून ठेवलंय.

लखनऊहुन ती पद्मावती एक्सप्रेसमध्ये जनरल डब्यात चढली. रात्री डब्यात काही तरुण हातात चाकू घेऊन डब्यात घुसले. सगळयांना धमकावून जे मिळेल ते लुटू लागले. कोणत्याही प्रवाशाने विरोध केला नाही.

तिच्या गळ्यात सोन्याची चेन होती.
ते दरोडेखोर तिच्याजवळ आलेत. एकाने तिला चेन देण्यासाठी दरडावले. दुसरा तिच्या गळ्यापाशी हात नेऊ लागला.

तीने विरोध केला. ती म्हणाली ,”मैं अपनी चेन नही दुंगी!”

ती विरोध करू लागली. एकाने तिच्या पोटावर लाथ मारली. तिच्या गळ्यातील चेन ओढून घेतली. पण ते पिसाळले होते. कोणीही विरोध करत नसताना एक मुलगी आपल्याला विरोध करतेय हे त्यांना पचलं नाही. ट्रेन भरधाव सुरू होती. त्या नीच उलट्या काळजाच्या लोकांनी तिला ओढत दरवाज्यापाशी नेले आणि भरधाव वेगातील रेल्वेतुन बाहेर ढकलून दिले.

रात्रीची वेळ..ती जोराने आदळली. कंबरेपासून पायाचे हाड मोडलेत. चेहऱ्यावर जखमा..ती जिथे आदळली त्याला लागून दुसरा रेल्वेमार्ग होता. दुसऱ्या ट्रॅकवरील रुळांवर तिचा पाय होता. तिने उठायचा प्रयत्न केला. पण ती उठू शकली नाही. पाय हलत नव्हता. समोरून एक रेल्वे त्याच ट्रॅकवरून येत होती. ती तिच्यापायांवरून गेली. रात्रभर रेल्वे येत जात होत्या. रुळांखालील उंदीर तिचे पाय, केस कुरतडत होते. रेल्वेतील मलमूत्र तिच्या चेहऱ्यावर, अंगावर पडत होतं. बऱ्याच वेळानंतर तिची शुद्ध हरपली.

एका प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला भरती करण्यात आलं आहे. हे तिला जाणवलं. सकाळी कोणालातरी ती ट्रॅकवर पडलेली, भेसूर अवस्था झालेली दिसली.

तिचा पाय कापण्याचा निर्णय झाला. तिच्या समोर तिचं व्हॉलीबॉल करिअर संपताना तिला दिसत होतं.

“सर अपने पास क्लोरोफॉम नही है!” तिच्या कानी कोणाचेतरी शब्द पडलेत. लवकरात लवकर, विष पूढे जाण्यापूर्वी पाय कापणं गरजेचं होतं. तिने डॉक्टरांना स्वतः सांगितलं “मी रात्रभर इतक्या वेदना सहन केल्या आहेत की आता मी हे सुद्धा सहन करू शकते. तुम्ही क्लोरोफॉर्मशिवाय माझा पाय कापा..!”

तिचा पाय कापण्यात आला. क्लोरोफॉमशिवाय.त्याही वेदना सहन केल्या तिने. काय मानसिक अवस्था झाली असेल तिची त्या वेळी! शारीरिक वेदना तर सहन करण्यापलीकडे होत्या.

त्यानंतर तिला दिल्लीत एम्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. या काळात मीडियाने अत्यंत नीच आरोप करत तिलाच दोषी ठरवू लागले. “अरुणिमाकडे तिकीट नव्हतं म्हणून तिनेच बाहेर उडी मारली” अश्या बातम्या वर्तमानपत्रात, न्यूज चॅनल्सवर आल्यात.

ती आतून तुटत होती..मरत होती. त्यावेळी तिने एम्स हॉस्पिटलमध्ये स्वतःपुढे एक विलक्षण एम ठेवलं. आयुष्यातील सगळ्यात मोठी खेळी खेळण्याचं ठरवलं!

तिने ठरवलं “माउंट एव्हरेस्ट” सर करण्याचं!

सगळयांनी तिला मूर्खात काढलं. अरुणिमा या अपघातामुळे ठार वेडी झालीये लोक म्हणू लागले.

सामान्य लोकांना, हिशोबी, सुरक्षित जगणाऱ्यांना हे माहिती नसतं की वेडे लोकच इतिहास घडवतात. क्रांती घडवतात. वेगळी पाऊलवाट तयार करतात.

अरुणिमा सिन्हाला कृत्रिम पाय लावण्यात आला.
ती हॉस्पिटलमधून भावासोबत बच्चेंन्द्री पाल यांना बिहारमध्ये भेटायला गेली. बच्चेंन्द्री पाल” या प्रथम भारतीय स्त्री माउंट एव्हरेस्टवीर आहेत.

त्यांनीही तिला प्रथम विरोध केला. पण अरुणिमाची जिद्द बघून त्या म्हणाल्या ,” तू आधीच तुझ्या मनात एव्हरेस्ट सर केलंय! आता फक्त लोकांना ते दाखवायचं शिल्लक आहे!

त्यांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला. पण कर्म तर तिचं तिलाच करायचं होतं.

भारतात एकूण चार केंद्र सरकार आणि संरक्षण मांत्रालयाखाली येणारे पर्वतारोहन केंद्रे आहेत.

येथील प्रशिक्षण किती कडक आहे हे ट्रेकिंग ग्रुप्स सोबत मजा मस्ती करायला, सेल्फी काढायला जाणाऱ्या लोकांना कळू शकणार नाही.

या चारमध्येही सगळयात कडक आणि कठीण दोन केंद्रे, दार्जिलिंगचं आणि उत्तरकाशीचं जवाहरलाल नेहरू पर्वतारोहन केंद्र .

अरुणिमाची रवानगी उत्तर काशीच्या केंद्रात झाली. अत्यन्त कठीण ,कडक प्रशिक्षण सुरू झालं. चालताना ती सगळ्यांच्या मागे राहायची कारण मध्येच पाय मांडीतून निघून जायचा. तिला खूप उशीर होऊ लागला. ती तीन ते चार तास उशीर व्हायचा. पायातून रक्त यायचं.

या केंद्रात एक नियम असतो, संध्याकाळी प्रशिक्षण आटोपल्यावर प्रत्येकाला स्वतःच्या पायाचे निरीक्षण करायला सांगितलं जातं. कारण पायाला बारीक फोड ज्यांना ‘ब्लिस्टर्स’ म्हणतात, ते आले असतील तर प्रशिक्षण बंद करायला सांगतात. कारण ते खूप धोक्याचं , सेप्टिक होण्याचा धोका आणि वेदनादायी असतं.
मी हा कोर्स केला असल्याने मला याची संपूर्ण जाणीव आहे.

अरुणीमा सिन्हाच्या पायातून तर रक्त येत होतं. ती सतत मांडीतून कृत्रिम पाय काढायची ,रक्त पुसून पुढे चालायची.

तिने दुसऱ्या दिवसापासून ठरवून टाकलं की काहीही होवो आता पाय काढून बघायचा नाही.
वेदना सहन करत चालत, हळूहळू तिची प्रगती होऊ लागली. जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर ती प्रथम येऊ लागली. सगळेजण थक्क झालेत तिच्या इच्छाशक्तीपुढे.

“अरुणिमा तुम क्या खाती हो?” विचारू लागलेत.

अरुणिमाचं एक महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झालं. परीक्षा A ग्रेडने पास झाली.
आता लक्ष होतं ‘एव्हरेस्ट’. या पृथ्वीवरील सगळ्यात उंच जागा! टॉप ऑफ द वर्ल्ड!

“टाटा स्टील”कडून तिला प्रायोजकत्व मिळाले. आणि अरुणिमा निघाली नेपाळकडे.

काठमांडुला पशुपतीनाथाचं दर्शन घेऊन दुसऱ्या दिवसापासून तिची चढाई सुरू झाली. शेर्पा तिच्या मदतीला होता. पण जेव्हा त्याला अरुणिमाच्या पायाबद्दल कळलं, त्याने एका अपंग मुलीसोबत जाण्यास नकार दिला. अरुणिमाने विनवण्या करून शेर्पाला राजी केले. ती म्हणाली तुम्हाला कुठेही जाणवणार नाही की तुम्ही एका अपंग मुलीसोबत चाललाय.

काही दिवसांच्या चालण्यानंतर , संकटं झेलत ,मृत्यूच्या दाढेतुन वाचत ती शिखरापासून काही मिनिटांवर येऊन पोहचली. रस्त्यात अनेक प्रेते दिसलीत. तेव्हा तिच्या समोर एक जर्मन पर्वतारोही पाय घासून मरताना दिसला.

एका ठिकाणी बर्फावर रक्त सांडलेलं दिसलं. पुनः काही प्रेते दिसलीत.
त्या सर्व प्रेतांना ओलांडून ती समोर गेली.
आणि शेवटी एव्हरेस्ट शिखर सर केलं..

एप्रिल 2011ला तिचा अपघात झाला आणि 21 मे 2013ला सकाळी 10 वाजून 55 मिनिटांनी ती पृथ्वीवरील सर्वात उंच जागेवर उभी होती. शी वॉज अॅक्च्युअली ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड.

पण…

पण अजूनही एक फार मोठं संकट बाकी होतं. तिचा प्राणवायू संपत आला होता. तिला जाणीव झाली होती की ती जिवंत परत जाऊ शकणार नाही.

म्हणून किमान जगाला आपला व्हिडीओ दिसावा म्हणून तिने शेर्पाला कॅमेराने तिला चित्रित करायला सांगितलं.

शेर्पा तिच्यावर प्रचंड चिडला. आणि मला तुझ्यासोबत मरायचं नाहीये असं म्हणाला. कारण परिस्थिती खूप बिकट होती. शिखरावर भयानक वेगाने वारे वाहत होते. लवकरच वादळ येणार होतं. आणि सगळ्यात मोठं संकट म्हणजे प्राणवायू संपत होता. पण तिची जिद्द बघून तो शेर्पाही नतमस्तक झाला. तो म्हणाला, “अरुणिमा आता मी मेलो तरीही चालेल पण तुला एकटं सोडणार नाही! तुला जिवंत परत खाली घेऊन जाईन!”

वेगाने ते परतीला निघालेत. पण तिचा कृत्रिम पाय सतत मांडीतून निखळत होता. त्यामुळे तिला चालताना खूप त्रास होत होता. पण तिची शर्यत लागली होती मृत्यूबरोबर! तोही वेगाने तिच्या मागे येत होता. तिला बाद करण्यासाठी. झडप घालण्यासाठी.

तिच्या डोळ्यातुन अश्रू येत होते..उंच ठिकाणी चालताना तोंडात लाळ निर्माण होत असते. तिच्या तोंडातील लाळ खाली पडताना ‘टक’ असा आवाज येई, कारण खाली पडेपर्यंत त्याचा बर्फ होत होता. अश्रूही खाली ओघळताना बर्फ होत होते.

तिचा हात काळा निळा पडला होता. फ्रॉस्ट बाईट, बर्फ बाधा म्हणतात. हातसुद्धा कापावा लागणार होता. पण ती जिवंत राहिली तर..
चालता येत नव्हतंच.

शेवटी तिने एक भयंकर निर्णय घेतला, तिने पाय काढून टाकला..आणि तशीच स्वतःला घासत चालू लागली. एका हातात स्वतःचा एक पाय..काय दृश्य असेल ते!

देव जगात असेल तर तो ही इतक्या उंचावर ,’जवळून’ तिला बघत असेल तर त्यानेही तोंडात बोट घातलं असेल!

एव्हरेस्ट मोहिमे दरम्यान सगळ्यात जास्त मृत्यु हे परत येताना होत असतात.
त्या क्षणी अरुणिमाकडे फक्त पाच मिनिटांचा प्राणवायू शिल्लक होता. दोघांनाही माहिती होतं आता तिचा मृत्यू अटळ.

आणि नेमका तेव्हा एक ब्रिटिश पर्वतवीर जास्तीचा प्राणवायू सिलेंडरसोबत दिसला. त्याला त्या सिलेंडरचं वजन होत असल्याने त्याने तो सिलेंडर तिथेच टाकून दिला. शेर्पा धावत तिथे गेला, सिलेंडर अर्ध भरलं होतं. त्याने ते प्राणवायूचं सिलेंडर आणून अरुणिमाच्या पाईपला जोडलं. अरुणिमाला पुनर्जीवन मिळाले.

अरुनिमा सिन्हाला 2015 मध्ये ‘पद्मश्री’ने गौरविण्यात आले.

मी आदल्या रात्री एका कार्यक्रमात प्रत्यक्ष अरुणिमा सिन्हाला ऐकून, बघून आलो होतो. तेव्हा मी मित्राला ओरडून म्हणालो , “ही आजच्या काळातील झाशीची राणी आहे!”

त्यावेळी संध्याकाळी मी झाशीच्या किल्ल्यासमोर होतो. खिडकीतून बघत होतो. पण डोळ्यासमोर राणी लक्ष्मीबाई येत नव्हती. दिसत होती ती आजच्या काळातील झाशीची राणी, एव्हरेस्टवीर, पद्मश्री अरुणिमा सिन्हा!

त्या काळात मी खूप नैराश्याने ग्रासलो होतो.
करिअरपासून सगळीकडेच नकारत्मक वाटत होतं.
पण अरुनिमा सिन्हाला ऐकल्यावर माझ्यात उत्साह संचारला. मी दररोज व्यायाम, सूर्यनमस्कार, आणि धावण्यास सुरवात केली. भीती दूर पळत गेली. इतकं कोणासोबत वाईट घडल्यावरही त्यातून एक व्यक्ती इतक्या पूढे जाऊ शकते तर मी तर धडधाकट आहे. कारण तिच्या इतक्या शारीरिक आणि मानसिक वेदना सहन केलेली मी तरी कोणी व्यक्ती आजवर बघितली नाही.

अरुणिमा सिन्हा हे जिवंत उदाहरण आहे सकारात्मकतेचं..जिद्दीचं..विलक्षण इच्छा शक्तीचं..

वाईट लोकांनी तिला अपंग केलं. तिने भारतातील कृत्रिम पायाने एव्हरेस्ट सर केलेली प्रथम व्यक्ती, हा इतिहास, रेकॉर्ड करून दाखवला.

मी या जन्मात आधुनिक झांशीच्या राणीला बघितलं आहे. जेव्हा जेव्हा वेदना होतात मनाला तर अरुनिमा सिन्हा आठवते. कारण तिच्या मानसिक आणि शारीरिक वेदनांपुढे माझ्या वेदना मला तृणवत वाटू लागतात...

#साभार

Address

Satara
415001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Insight Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Insight Academy:

Share