08/08/2025
‘वृक्षबंधन’ उपक्रमाने ठाण्यात दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ठाणे, ७ ऑगस्ट २०२५:
वनशक्ती संस्था आणि मो. ह. विद्यालय, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मासुंदा तलाव परिसरात ‘वृक्षबंधन’ हा आगळावेगळा उपक्रम साजरा करण्यात आला. या उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा अनोखा संदेश देण्यात आला.
या उपक्रमात विद्यालयाच्या स्काऊट-गाईड पथकातील सुमारे ४० विद्यार्थ्यांनी परिसरातील देशी वृक्षांना पर्यावरणपूरक राख्या बांधून ‘वृक्ष रक्षण’ आणि ‘संवर्धन’ करण्याचा संकल्प केला. शाडू माती, धान्य, सुकलेली फुलं, पुनर्वापर केलेला कागद, कापड व बीजांचा वापर करून विद्यार्थ्यांनी जैवविघटनशील राख्या तयार केल्या.
कार्यक्रमात राखीची पालखी साकारून ती मिरवणूक स्वरूपात तलाव परिसरात फिरवण्यात आली. “झाडे लावा, झाडे जगवा”, “पर्यावरण संवर्धन करा”, अशा घोषणांनी परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली.
कार्यक्रमात ताम्हण (राज्यफूल), पिंपळ, हिरवी सावर, कदंब यांसारख्या देशी वृक्षांना राख्या बांधण्यात आल्या. हे वृक्ष जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले.
“वृक्षबंधन उपक्रम म्हणजे निसर्गाशी एक आपुलकीचं नातं जपण्याचा आणि भावी पिढ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा सशक्त प्रयत्न आहे.”
– प्राचार्य विकास पाटील, मो. ह. विद्यालय, ठाणे
“या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात पर्यावरण जागरूकता पोहचवणे, देशी वृक्षांचे महत्त्व पटवून देणे आणि सणांमध्ये शाश्वतता जपणे हा मुख्य उद्देश होता.”
– चित्रा म्हस्के, प्रकल्प अधिकारी, वनशक्ती संस्था
या कार्यक्रमात शिक्षक सुनील पाटील, स्नेहा शेडगे, मारुती सोनामोरे, श्वेता झाडे, देवेंद्र पाटील, प्रणाली शेंबेकर, संगीता धनकुटे, अरुणा पाटील तसेच वनशक्ती संस्थेचे फिरदोस खान यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.