04/07/2022
अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ येथे “कृषि दिन” साजरा
अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला) अंतर्गत यवतमाळ येथे दिनांक ०१ जुलै २०२२ रोजी राष्ट्रीय सेवा योजना द्वारा कृषी क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्य “कृषिदिन” साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजयराव माने, प्रमुख मार्गदर्शक तथा सत्कारमूर्ती उमरखेड येथील शेतीमित्र पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री.अशोकराव वानखेडे तसेच यवतमाळ येथील प्रमुख अतिथी म्हणून वसंतराव नाईक कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन.डी.पार्लावार, यवतमाळ येथील विभागीय कृषि संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगिरवार आणि कृषि संशोधन केंद्र यवतमाळ येथील प्रभारी अधिकारी डॉ. आशुतोष एस. लाटकर इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते.
कृषि दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या वतीने उमरखेड तालुक्यातील सुकळी येथील संयुक्त कुटुंब संस्कृती सोबतच शेतीशी आपली नाळ जोपासत असलेले राष्ट्रीय कृषी पुरस्कार प्राप्त प्रगतीशील शेतकरी श्री. अशोकराव वानखेडे यांचा महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजयराव माने यांच्या हस्ते शाल-श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
श्री. वानखेडे यांनी कै. वसंतराव नाईक यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देतांना, सन १९७२ साली भारत देशात अन्न धान्याचा तुटवडा निर्माण झाला असता हरितक्रांती घडविणारे *कृषि संत* असे गौरवोद्गार काढले. तसेच कै.वसंतराव नाईक यांनी सदैव कटिबद्ध राहून शेतकर्यांच्या हिताचे निर्णय कसे घेतले, शेतकरी कारखानदार व्हावा, शेतकऱ्यांच्या हितार्थ विविध कृषियोजना तसेच पंचायत राज इत्यादी योजना राबवून शेतकरी वर्गाची कश्यापद्धतीने विकासाकडे वाटचाल घडवून आणली याविषयी मार्गदर्शन केले.
सहकार क्षेत्रामार्फत शेतकऱ्यांना शेतीविषयक कर्ज सुविधा, शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य मोबदला मिळावा याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना, कापूस एकाधिकार योजना, शेतीला पाण्याची उपलब्धता निर्माण करण्याकरिता पाझर तलाव, वसंत बंधारा इत्यादींची निर्मिती केली. असे प्रतिपादन डॉ. एन.डी.पार्लावार यांनी केले.
थोर महापुरुषांच्या जयंती निमित्य त्यांचे गुण विद्यार्थ्यांनी अंगीकारणे गरजेचे आहे. आज जयंती दिनी संकल्प करूया असे प्रतिपादन डॉ. प्रमोद यादगिरवार यांनी केले.
कै. वसंतराव नाईक यांनी हरितक्रांती सोबतच श्वेतक्रांती करून संपूर्ण देश सुजलाम सुफलाम केला. तसेच महाराष्ट्र राज्यातील भौगोलिक रचनेनुसार विविध भागात चार कृषी विद्यापीठाची स्थापना, विदर्भातील पहिला वसंत सहकारी साखर कारखाना व सूतगिरणी ची निर्मिती केली. अन्न तंत्रज्ञान च्या विध्यार्थ्यानी गुणवत्तेला महत्व देवून शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतीमालाला योग्य मोबदला देण्याकरिता विविध संशोधन व तंत्रज्ञानाच्या सानिध्याने विषमुक्त आणि गुणवत्तापूर्ण प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ निर्माण करण्याकरिता प्रयत्न करावा हीच खऱ्या अर्थाने कै. वसंतराव नाईक यांना आदरांजली ठरेल असे अध्यक्षीय भाषणात डॉ. विजयराव माने यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी रोशनी कोंबे व यश वालदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन भारताच्या स्वतंत्र महोत्सवी वर्षांत राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत डॉ. जयश्री उघाडे कार्यक्रम अधिकारी( रासेयो), श्री. आनंद भुसारी उपकार्यकारी अधिकारी( रासेयो), डॉ. निखील सोळंके, डॉ. प्रिती ठाकूर, डॉ. प्रदिप थोरात, डॉ. नितीन सुरडकर, डॉ. रोजी वाघमारे, डॉ. जगदीश सांगळे व श्री. भुषण जगताप यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या विद्यार्थिनि प्रिया कराळे व साक्षी डोंगे यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नितीन सुरडकर व आभार प्रदर्शन महाविद्यालयाचा विध्यार्थी पूर्वेश हिवसे यांनी केले. महाविद्यालयाचे अधिकारी-कर्मचारी विद्यार्थी यांच्या सहकार्याने सदर कार्यक्रम संपन्न झाला.